मराठी

#IndependenceDay भारत: अस्मिता-संस्कृती-आत्मभानाचे प्रतिक!

'भारत' हे नाव केवळ भौगोलिक नसून, ती एक अखंड निष्ठा, गौरवशाली वारसा आणि उज्ज्वल भविष्याची आशा..!

#IndependenceDay#IndependenceDay भारत: अस्मिता-संस्कृती-आत्मभानाचे प्रतिक! या लेखात भारत म्हणजे काय ते थोडक्यात सांगून राष्ट्रभान जागविण्याचा प्रयत्न केला आहे, राष्ट्रीय विषयांवर लिखाण करणारे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत तिजारे यांनी.. पाहू या.. 

 

श्रीकांत तिजारे

 

“उत्तरं यत् समुद्रस्य, हिमाद्रेश्चैव दक्षिणम्। तद् भारतं नाम राष्ट्रं, भारतीजत्र सन्ततिः॥” या विष्णुपुराणातील वचनानुसार, समुद्राच्या उत्तरेस आणि हिमालयाच्या दक्षिणेस वसलेला भूभाग म्हणजेच ‘भारत’, जिथे राजा भरताचा वंश वाढला. ‘भारत माझा देश आहे’ हे केवळ शब्द नसून, प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजलेली एक खोल भावना आहे. हा केवळ एक भौगोलिक प्रदेश नाही, तर विविध संस्कृती, परंपरा, भाषा आणि इतिहासाचा एक सुंदर संगम आहे.

 

भारताचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. मानवी संस्कृतीच्या प्राचीन पाऊलखुणा सिंधू-सरस्वती संस्कृतीत आढळतात, जिथे हडप्पा आणि मोहेंजोदडोसारखी विकसित शहरे उदयास आली. त्यानंतर वैदिक काळात धर्म, तत्त्वज्ञान आणि समाज रचनेचा पाया घातला गेला. मौर्य आणि गुप्त साम्राज्याचा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो, जिथे विज्ञान, गणित, तत्त्वज्ञान आणि साहित्याने मोठी प्रगती केली. आर्यभट्ट, वराहमहिर आणि कालिदास यांसारखे विद्वान याच काळात होऊन गेले.

 

मध्ययुगात दिल्ली सल्तनत आणि मुघल साम्राज्याची स्थापना झाली, ज्यामुळे भारताच्या कला, स्थापत्यशास्त्र आणि संस्कृतीवर मोठा प्रभाव पडला. याच काळात भक्ती आंदोलन, सुफी परंपरा आणि मराठा साम्राज्याचा उदय झाला. १७५७ नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे वर्चस्व वाढले आणि १८५८ मध्ये भारताची सत्ता ब्रिटिश सरकारकडे गेली. या काळात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, पण त्याचबरोबर स्वातंत्र्यसंग्रामाची ज्योत पेटली. महात्मा गांधी, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

 

#IndependenceDay
Har Ghar Tiranga campaign

आपला देश ‘भारत’, ‘हिंदुस्तान’, ‘इंडिया’, ‘आर्यावर्त’ आणि ‘जंबुद्वीप’ अशा अनेक नावांनी ओळखला जातो, आणि प्रत्येक नावामागे एक समृद्ध इतिहास आहे. ‘इंडिया दॅट इज भारत’ असा उल्लेख भारतीय संविधानातही आहे.

 

भारतीय संस्कृती ही हजारो वर्षांची असून, विविध धर्म, जाती, भाषा, सण, आचार आणि विचारांच्या संमिश्रणातून ती तयार झाली आहे. भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी, येहुदी असे अनेक धर्मीय लोक एकत्र नांदतात. ‘वसुधैव कुटुंबकम्’ (संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे) हा विचार भारतीय परंपरेचा गाभा आहे. ‘अतिथी देवो भव’, ‘सत्यमेव जयते’, ‘अहिंसा परमो धर्मः’ आणि ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ ही मूल्ये भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत. दिवाळी, दसरा, ईद, ख्रिसमस यांसारखे अनेक सण येथे एकत्रितपणे साजरे केले जातात, जे सामाजिक सलोख्याचे प्रतीक आहे.

 

भारतीय कला, स्थापत्यशास्त्र, संगीत आणि नृत्य प्रकार जगभरात प्रसिद्ध आहेत. अजिंठा-वेरूळच्या लेण्यांपासून ते ताजमहालापर्यंत, भरतनाट्यम ते कथकलीपर्यंत, भारताची कलात्मकता प्रेरणादायी आहे. तसेच, प्रत्येक प्रदेशाची स्वतःची वेगळी ओळख त्यांच्या पारंपरिक पोशाख आणि पाककृतीतून दिसून येते. भारताची भौगोलिक विविधताही थक्क करणारी आहे, जिथे हिमालयाच्या पर्वतरांगा, सुपीक मैदाने, वाळवंट आणि किनारपट्टीचा समावेश आहे. भारत अध्यात्माचा आणि योगाचा जन्मदाता असून, योग आणि आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे.

 

#IndependenceDayस्वातंत्र्यानंतर भारताने अनेक आव्हानांवर मात केली आहे. आजचा भारत हा प्राचीन गौरव आणि आधुनिक प्रगतीचा संगम आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारताने मोठी प्रगती केली आहे, माहिती तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन (इस्रो), आणि अणुऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. ‘डिजिटल इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ यांसारख्या उपक्रमांमुळे भारत जागतिक स्तरावर तंत्रज्ञान केंद्र बनत आहे. ‘एक देश, एक कर प्रणाली’ (जीएसटी) आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) यांसारख्या धोरणात्मक निर्णयांनी देशाला आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर बळकटी दिली आहे. महिला सक्षमीकरण, सामाजिक समावेश आणि पर्यावरणपूरक विकासावरही भर दिला जात आहे.

 

नवा भारत ही केवळ आर्थिक किंवा तांत्रिक प्रगतीची कल्पना नाही, तर तो मूल्यांवर आधारित एक सशक्त सामाजिक परिवर्तन आहे. ‘स्व’ म्हणजे आत्मभान आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जाणारा, आपली संस्कृती, भाषा आणि परंपरेचा अभिमान बाळगणारा, आणि आधुनिक जगाशी संवाद साधणारा हा नवा भारत आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारातून तो संपूर्ण जगाशी हातमिळवणी करत आहे. हा केवळ विकासाचा भारत नाही, तर सशक्त, समृद्ध, समावेशक आणि आत्मनिर्भर भारत आहे.

 

‘भारत’ हे नाव केवळ भौगोलिक नसून, ती एक अखंड निष्ठा, गौरवशाली वारसा आणि उज्ज्वल भविष्याची आशा आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेला हा समृद्ध वारसा जतन करीत, आपण एका नव्या, विकसित आणि एकात्म भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होऊया. कारण, भारत केवळ एक भूमीचा तुकडा नाही, तर तो आपल्या सर्वांच्या आत्म्याचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच आपण सारे म्हणतो “भारत” माझा देश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद.

 

 


 

More in Marathi on http://www.indiainput.com

 

#IndependenceDay श्रीकृष्णाचा वारसा आणि राष्ट्र निर्माण!

 

 

पर्प्लेक्सिटी एआय: संवादात्मक एआय सह शोध दिग्गजांना आव्हान

 

India2UK पंढरपूर ते लंडन वारी: 22 देश, 70 दिवस, 18000 किमी!

 

Organic Ganesha Idols : यंदा बसवूया..गोमय गणेश मूर्ती !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

seven + eighteen =

Back to top button