#IndependenceDay श्रीकृष्णाचा वारसा आणि राष्ट्र निर्माण!
"..स्वातंत्र्य हे बाकी कुठल्याही धनापेक्षा फार फार महान धन आहे. त्याची तुलना कशासंगेही नाही!"

#IndependenceDay श्रीकृष्णाचा वारसा काय आहे.. श्रीकृष्णाची जीवन गाथा काय शिकविते.. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि स्वातंत्र्यदिन एकाच दिवशी आहेत.. त्यातून राष्ट्रनिर्माणाची प्रेरणा घेण्याचा हा दिवस, असं http://www.indiainput.com च्या वाचकांना सांगताहेत, चिंतक आणि लेखिका अरुंधती प्रवीण दीक्षित..
श्रीकृष्ण जीवन गाथेचे ठळक महत्वाचे पदर उलगडून पाहिले, तर त्यातून महत्वाचा संदेश मिळतो तो कोणता.. वाचू या..
अरुंधती प्रवीण दीक्षित
स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!
ज्या श्रीकृष्णाचा जन्म शत्रूच्या काटेकोर नियंत्रणात असलेल्या एका काळकोठडीत, पारतंत्र्यात झाला आणि जन्मापासूनच ज्याचा स्वातंत्र्यलढा सुरू झाला;
आई वडलांची ताटातूटही बरी.. पण, साक्षात मृत्यूची टांगती तलवार असलेलं पारतंत्र्य नको म्हणून, आईच्या स्तनांपासून बळजबरीने दूर करून, देवकीच्या हुंदक्यांची पर्वा न करता वसुदेवाने ज्याला नंदाच्या स्वातंत्र्याच्या अंगणात नेऊन पोहोचवलं;
सूर्य किरणांची तिरीप येताच जग उजळून जावं तसे, ज्याने छोट्याशा गावातील, भोळ्या-भाबड्या स्वतःच्या संसारात लिप्त झालेल्या, संसारापुढे भविष्यच नसलेल्या गवळणींना भवतापापासून स्वातंत्र्य देणारं, उजळवून टाकणारं तत्त्वज्ञान दिलं;
ज्याने कंस, शिशुपाल, जरासंध, जयद्रथ इतकच कशाला तर भीष्म द्रोणांसारख्या अनेका अनेकांना मोक्षाचा मार्ग सुलभ करून, दुराचारी अमलातून जनतेला मुक्त करून उर भरून श्वास घेण्याचा अनंद दिला;
ज्याने कुटिल, कट कारस्थानी कौरवांच्या राजकारणात फसलेल्या वनवासी पांडवांना वनवासातून सोडवून, स्वातंत्र्याचं आणि धर्माचं/जनहिताचं राज्य स्थापन केलं;
लांड्यालबाड्या, अयोग्य वर्तन, लांगूलचालन ह्यांनाच प्रतिष्ठा मिळवून देणार्या, अहितकारक अशा दुर्योधनाच्या शासनाचा ज्याने अंत केला;
हे गृहयुद्ध (सिव्हिल वॉर) किती जणांचा बळी घेईल हे दिसत असतानाही अहितकारक आचरणाला ‘चलता हैं तो चलने दो’ म्हणत तसच पुढे चालू न ठेवता, सर्वशक्तिनिशी त्याचा प्रतिकार करून, जमिनीत गाडून धर्माधिष्ठित नवीन पिढीच्या हाती समाजाची धुरा असावी म्हणून युद्धही घडवून आणलं;
ज्याने नरकासुराच्या बंदिवासातील सोळा सहस्र नारींना स्वातंत्र्याचा दिवस दाखवला;
ज्याने आदरास पात्र असलेल्या ऋषीमुनींचा अपमान करणार्या, धरबंध सोडलेल्या आपल्या मुलांना आणि धनाने माजलेल्या यादवांनाही दयामाया न दाखवता नाशाच्या तटावर आपणहून नेउन पोचवलं आणि पृथ्वीला त्याच्या जाचातून मुक्त करून स्वातंत्र्याचा खुला श्वास घेण्याचं स्वातंत्र्य मिळवून दिलं;
इतकंच नाही, तर ज्याने गांधारीचा शापही अत्यंत नम्रपणे स्वीकारत तो स्वतःच्या इहलोकाची यात्रा संपविण्याची क्षितिज रेखा मानली; उद्धवाला शेवटचा उपदेश करून त्यालाही मुक्तिमार्ग दाखवला;
त्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिन आणि स्वातंत्र्यदिन हे एकाच दिवशी येऊन; आपल्याला, प्रजेला हितकारक अशा स्वातंत्र्याची महती पुन्हापुन्हा अधोरेखित करत आहे.
मित्रांनो, स्वातंत्र्य हे बाकी कुठल्याही धनापेक्षा फार फार महान धन आहे. त्याची तुलना कशासंगेही नाही!
देश असेल तर धर्म! धर्म असेल तर आपलं हित! आणि हित असेल तरच आपली प्रगती!
त्यामुळे स्वातंत्र्याचा सौदा कशासोबतही नाही! स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!
आपल्याला सर्वांना कृष्णजन्माच्या आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!
More Marathi articles on http://www.indiainput.com